पवन मावळ विभागातील वारकऱ्यांची हि दिंडी म्हणजे या विभागाचे सांस्कृतिक वैभव आहे – ज्ञानेश्वर दळवी
पवनानगर ( प्रतिनिधी ) : पवन मावळ विभागातील ऐतिहासिक वाघेश्वर गावातून श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त अर्थात आळंदी यात्रेनिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीच्या दिशेने प्रस्थान केलेल्या पालखी सोहळ्याचे आणि पायी दिंडीतील वारकऱ्यांचे माजी सभापती ज्ञानेश्वर उर्फ माऊली दळवी यांनी कोथुर्णे गावात अतिशय भक्तिभावाने आणि जल्लोषात स्वागत केले.
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी… असा गजर करीत आणि ‘ज्ञानोबा – माऊली – तुकाराम’ नामाचा जयघोष करीत पवन मावळ विभागातील शेकडो वारकरी बंधू भगिनी हे वाघेश्वर येथून निघालेल्या पालखी सोहळ्यात सहभागी होत तीर्थक्षेत्र आळंदीच्या दिशेने निघाले आहेत. दरवर्षी हे वारकरी मोठ्या उत्साहात आळंदी यात्रेला जात असतात. पवन मावळ विभागातील वारकऱ्यांची हि दिंडी म्हणजे या विभागाचे सांस्कृतिक वैभव आहे.
माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी यांच्या माध्यमातून दरवर्षी वारकऱ्यांचे स्वागत करून त्यांची सेवा केली जाते. यंदाही कोथुर्णे गावात वारकऱ्यांचे उत्साहात स्वागत करून हरीदासांची सेवा श्री. दळवी यांनी व संपूर्ण कोथुर्णेवासियांनी केली. तदनंतर पालखीला खांदा देऊन काही पावलांची संगतही श्री दळवी यांनी केली.
तीर्थक्षेत्र देहू आणि तीर्थक्षेत्र आळंदी येथे दरवर्षी पवन मावळ विभागातील शेकडो वारकरी भाविक पायी दिंडीच्या माध्यमातून जात असतात. कार्तिक महिन्यातील आळंदी यात्रेसाठी दरवर्षी या भागातून पालखी आणि दिंडी जात असते. या वारकरी भाविकांचा प्रवास निर्विघ्न व्हावा, अशी प्रार्थना ज्ञानेश्वर दळवी यांनी केली.
काले – कुसगांव बुद्रुक जिल्हा परिषद गटातून इच्छुक असलेले भाजपाचे ज्ञानेश्वर दळवी हे सध्या जनसामान्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहेत. नुकतीच त्यांची काले – कुसगांव गटातील बहुतांश गावांतील काकडा आरती सोहळ्यास आणि कीर्तन सोहळ्यास भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला होता. जनसामान्यांत सहज मिसळणारा आणि त्यांच्या सुख – दुःखात सहभागी होणारा नेता नव्हे कार्यकर्ता अशी श्री. दळवी यांची ओळख आहे.

